पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षाचे संस्थापक काशीराम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भारतरत्न देण्याची मागणी होत आहे. दलितांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याबद्दल काशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. बसपा अध्यक्ष मायावती नेहमीप्रमाणे हि मागणी जोरदार पणे रेटण्यात सर्वात पुढे आहेत .
हि मागणी करत असताना त्यांनी भाजपा , काँग्रेस सह इतर सर्वच पक्षांवर गंभीर आरोप करताना सांगितले की भाजपा , काँग्रेस आणि इतर सर्वांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांचा फक्त मतं मिळवण्यासाठी वापर केला आहे आणि हे पक्ष फक्त मतांसाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांच्या जंयत्या साजऱ्या करतात . याचाच अर्थ असा होतो की मायावती यांना सरळ - सरळ हेच सांगायचं आहे की आंबेडकर आणि काशीराम यांच्या जयंती साजऱ्या करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्यांनाच आहे ...
दलितांच्या उत्थानासाठी केलेले काशीराम यांचे कार्य कुणीही नाकारू शकत नाही. परंतु स्वतःला काशीराम यांची वारसदार म्हणवून घेणार्या मायावतींनी दलितांसाठी काय केले हे कुणालाही ठाऊक नाही .
देशातील सर्वात मोठं आणि केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी सर्वात महत्वपूर्ण असलेल्या उत्तर प्रदेश सारख्या राज्याने काशीराम यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्या राजकिय वारसदार मायावतींना चार वेळा मुख्यमंत्री केलं परंतु मायावती मुख्यमंत्री होवुन सुध्दा युपीतील दलितांचे हाल काही सुधारले नाहीत . मायावती सत्तेत असताना सुध्दा दलितांवरील अत्याचार कमी झाले नाहीत ...
दलितांची मते मिळवण्यासाठी भले ही मायावतींनी कोणत्याही पक्षावर आरोप केले असतील परंतु प्रत्यक्षात सत्य हे आहे कि चार वेळा मुख्यमंत्री बनण्याचा फायदा उत्तर प्रदेशात कोणाला जर झाला असेल तर तो स्वतः मायावतींना झाला आहे. राजकारणात येण्यापूर्वी एका शाळेत शिक्षिका असलेल्या मायावतींचे नाव आज देशातील सर्वात श्रीमंत राजकारण्यांमध्ये घेतल्या जाते . चार वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करते वेळी मायावतींची १११ कोटींची संपत्ती होती , ती आज चार वर्षांनंतर निश्चीतच वाढलेली असणार आहे.
मायावतींनी हि संपत्ती कशाप्रकारे कमावली याविषयी मायावतींनी कधीही माहीती दिलेली नाही . देशाला नाही सांगितलं तरी चालेल परंतु किमान भारतातील दलितांना तरी त्यांचा हा श्रीमंत होण्याचा फाॅर्मुला कळायला हवा ..
काशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्याचा मायावतींना संपुर्ण अधिकार आहेच त्यांनी या मागणीबरोबरच दलितांच्या विकासासाठी मागणी करावी सुध्दा. परंतु फक्त मागणी करत इतरांना दोष देण्यापेक्षा सत्तेत आल्यानंतर कृती सुध्दा करावी .. मायावतींना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि काशीराम यांच्या विषयी खरंच श्रध्दा असेल तर त्यांनी या महापुरुषांच्या नावाचा वापर स्वतःची राजकिय पोळी भाजण्यासाठी करू नये .महापुरुष हे सर्व जाती धर्मांचे असतात त्यांच्या विचारांचा प्रसार करता येत नसेल तर किमान त्यांना मर्यादित करण्यात हातभार लावू नये.
•▪ संदीप नागरगोजे, गंगाखेड ▪•
Comments
Post a Comment