हा बाजार बजेटचा ...
__________________________________
----------------------------------------------------------
भारतात कोणताही विषय पुर्ण देशभर वातावरण तयार करू शकतो . आजकाल जेंव्हा पासून खाजगी वृत्तवाहिन्या सुरू झाल्या आणि त्यांचा प्रसार झाला आहे तेंव्हापासून तर अशा कामांना खुपच बहार आली आहे . अर्थसंकल्पाच्या बाबत सांगायचे झाले तर आपल्याला अर्थसंकल्पाविषयी तेवढंच ज्ञान असते जेवढं एखाद्या कपडे शिवणार्या टेलर ला बांधकाम व्यावसाययाचे असते . अर्थातच जे अर्थसंकल्पावर तीवृ स्वरूपाच्या प्रतिक्रिया देतात त्यांना अर्थसंकल्प कितपत समजतो हा संशोधनाचा विषय आहे.
अशावेळी न्युज चॅनेल्सवरील चर्चां तर पार गोंधळात टाकण्याचे काम करतात . या चर्चांमध्ये जाणकार, अर्थतज्ञ , नेतेमंडळी पक्षाचे प्रवक्ते , विरोधी पक्षनेते, सल्लागार पत्रकार आणि अशी असंख्य पात्र जबरदस्त वादविवाद करतात . परंतु या चाललेल्या चर्चा वजा गोंधळात आपण एका गोष्टीकडे दुर्लक्ष करतो ती म्हणजे प्रवक्ता सत्ताधारी पक्षाचा असेल तर तो अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना हा अर्थसंकल्प ऐतिहासिक असल्याचे सांगतो आणि त्या अर्थसंकल्पास सर्वसमावेशक अर्थ संकल्प सिध्द करण्यासाठी स्वतःला त्या चर्चेत तासभर झोकुन देतो . त्याच वेळी विरोधी पक्षाचे लोक त्या अर्थसंकल्पाला निराशा करणारा अर्थसंकल्प वगैरे वगैरे सांगतात किंवा काही प्रवक्ते हा अर्थसंकल्प त्यांची काॅपी केलेला असल्याचे सांगतात .
प्रत्यक्षात सर्वच अर्थसंकल्पाबाबत एक समान बाब पहायची झाली तर प्रत्येक वेळी महागाई वाढलेली आहे . गेल्या काही वर्षांपासून च्या किमती कशा वाढल्या आहेत ते पहील्या वर ही गोष्ट स्पष्ट होते ..
या वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत खुप चर्चा आहे की हा अर्थसंकल्प ग्रामीण भागाचा आणि पर्यायाने गरीबांचा उध्दार करणारा आहे . सरकार ने सुटाबुटावरिल लक्ष ग्रामीण भागावर केंद्रीत केले आहे ही चांगली बाब आहे कारण मागचा काही वर्षांचा आपण पाठपुरावा केला तर शहरी भागाचा जेवढ्या झपाट्याने विकास होतोय तेवढाच ग्रामीण भाग जास्त मागास होत चालला आहे ..
दुसरीकडे "कार्पोरेट" जगत या अर्थसंकल्पावर प्रचंड नाराज असल्याच्या बातम्या वाचायला मिळत आहेत . आता या "कार्पोरेट" लोकांबाबत बोलायचं झालं तर हे कोणत्याच अर्थसंकल्पावर कधीच खुश नसतात . कारण या लोकांची पोटं एवढी मोठी आहेत की त्यांच्या पोटात सगळा देश जरी टाकला तरीही भरपुर जागा रिकामीच राहील .
ही गोष्ट मानावी लागेल की अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीय समुह नाराज आहे. हा समुह मनाने तर उच्च वर्गात प्रवेश करायला पाहातोय परंतु त्यासाठी त्याचा खिसा तेवढा जड नाही . या वर्गाला आशा होती की जेटली त्यांना करात सुट देतील परंतु त्यांची घोर निराशा झाली आहे... मध्यमवर्गीय नौकरदार समुह तर सातव्या वेतन आयोगाचे मिळणारे संभावित 'एरियर' सुध्दा 'इन्कम टॅक्स' भरण्यात जाते की काय अशा चिंतेत आहे..
असो ही तर शंका झाली . आपल्या आणि मोदींच्या सुदैवाने पेट्रोलियम पदार्थांचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी झाले आहेत नाहीतर संपूर्ण अर्थसंकल्पावर त्याचा परिणाम दिसुन आला असता ...सध्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात दुष्काळ जरी असला तरी न्युज चॅनल्स वर बजेट चर्चांचा सुकाळ आहे . चर्चांमध्ये असे काही विधान ऐकायला मिळतात कि ज्यामुळे काहीही न खाता झोप यायला लागलीय . त्यातच अर्ध्या रात्री जाग आली आणि वाढत्या महागाईचा विचार आला तर झोप पण मोदींच्या विदेशात जाणार्या विमानाप्रमाणे निघुन जाते...
-------● संदीप प्रभाकर नागरगोजे, गंगाखेड ●--------
Comments
Post a Comment