गोपीनाथगड....
परळी वैजनाथ जवळील लोकनेते मुंडे साहेबांच्या या समाधीस्थळाला गेल्या दोन वर्षांपासुन १२ डिसेंबर रोजी भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. १२ डिसेंबर हा लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे साहेबांचा जन्मदिवस.
इ.स. १९४९ मध्ये याच दिवशी परळी वैजनाथ जवळ असलेल्या नाथ्रा या गावी गरीब शेतकरी कुटुंबात साहेबांचा जन्म झाला.
याच दिवसापासून सामान्यांतून येवून असामान्य बनलेल्या या संघर्षयोध्याच्या थक्क करणार्या प्रवासाला सुरुवात झाली.
विद्यार्थ्यी दशेपासूनच गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन ह्या जिगरी दोस्तांची जोडी सामाजिक परिवर्तनाचा ध्यास घेवून सामाजिक कार्यात उतरली होती .
याच जोडीने पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबती महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले. आणि यात सिंहाचा वाटा तो लोकनेते मुंडे साहेबांचा.
राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर रान पेटवुन त्यांनी भ्रष्टाचार आणि सत्तेच्या माजात धुंद असलेल्या तात्कालिन सरकारला मुळासकट उपटून फेकण्याचे काम लोकनेते मुंडे साहेबांनी केले .
शिवनेरी ते शिवतीर्थ अशी 'संघर्ष यात्रा' काढून राज्यात पहिल्यांदाच शिवसेना - भाजप युतीचे सरकार आले.
१४ मार्च १९९५ रोजी युतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला . लोकनेते मुंडे साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली .
ठरल्याप्रमाणे शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद गेले मात्र लोकांचे आकर्षण मनोहर जोशी यांच्यापेक्षा जास्त हे मुंडे साहेबच होते .
युतीच्या जागावाटपावरून मुंडेसाहेबांनी गृहमंत्री,उर्जामंत्री, पाटबंधारे मंत्री आणि कालावधीसाठी वित्तमंत्री पदावर काम केले .
खरं तर जागावाटपावरून भाजपकडे महसूल खाते येणार होते .
परंतु महाराष्ट्रातील वाढलेली गुन्हेगारी बंद करण्यासाठी मुंडे साहेबांनी महसूल खात्याऐवजी गृहमंत्रालय घ्यावे अशी बाळासाहेबांची इच्छा होती .
मुंडे साहेबांच्या क्षमतेवर बाळासाहेबांचा प्रचंड विश्वास होता म्हणून साहेबांनी महसूल ऐवजी गृहमंत्री पद आपल्याकडे घेतले.
१९९२ ते १९९४ च्या कालखंडात महाराष्ट्रात गुन्हेगारी ने थैमान घातले होते . सभागृहातील त्यावेळेच्या तीन सदस्यांची आमदार विठ्ठल चव्हाण , आमदार प्रेमकुमार शर्मा आणि आमदार रमेश मोरे यांच्या निर्घृण हत्या करण्यात आल्या होत्या. मुंबई बॉम्बस्फोटात शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते तर त्याहीपेक्षा जास्त लोक कायमचे अपंग होवून बसले होते . जळगावात याच काळात महिलांची क्रूरपणे अब्रु लुटणारे वासनाकांड सुध्दा झाले होते .
अचानक कुठेही समाजकंटक दंगली घडवुन जनसामान्यांच्या मालमत्तेची लुटमार करण्यास निर्ढावलेले होते.
पोलिसांवर हल्ले होत होते .परंतु सरकार मात्र सुस्त पडलेले.
मुंडे साहेबांनी " शिवनेरी ते शिवतीर्थ " या संघर्ष यात्रेत याविषयी सरकार वर जोरदार प्रहार चढवला होता .
शरद पवारांना मॅनेज न होणारा पहिला विरोधी पक्षनेता म्हणुन मुंडे साहेबांनी ओळख तयार केली होती.
या पार्श्वभूमीवर राज्याला एका मजबुत आणि कणखर गृहमंत्र्याची गरज होती आणि त्या जागी मुंडे साहेबांच्या सारखा दुसरा कोणताही नेता चालणार नाही हे बाळासाहेब आणि प्रमोद महाजनांच्या लक्षात आले होते . साहेबांनी ती जबाबदारी फक्त स्विकारली नाही तर गृहमंत्रालयाची सुत्रे हाती घेताच मुंबई आणि महाराष्ट्राला गुन्हेगार मुक्त करण्यासाठी कडक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली.
"महाराष्ट्रात कायदा कोणालाही हाती घेवू दिल्या जाणार नाही, हे राज्य कायद्याचे आहे गुन्हा करणारी व्यक्ती कोणीही असो , ती कितीही मोठी असली तरी तिला गुन्हा केल्यास अटक केल्याशिवाय राहणार नाही . गुन्हेगारांना कधीच जात नसते गुन्हेगार फक्त 'गुन्हेगार' असतो अशी त्यांची भुमिका होती .
महाराष्ट्राला गुन्हेगारीमुक्त करण्याचा साहेबांनी निर्धारच केला होता. अंडरवर्ल्डच्या जबड्यात अडकलेल्या मुंबई मधून अंडरवर्ल्डचा सफाया मुंडे साहेबांनीच केला . दहशतवादी दाऊद इब्राहिम च्या १९ स्पेशल शुटर्सना यमसदनी पाठवले . १४ मार्च १९९५ ते १७ ऑक्टोबर १९९९ पर्यंत च्या मुंडे साहेबांच्या कार्यकाळात ४५० ते ५०० गुंडांचे एन्काऊंटर झाले . आणि साहेबांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्रातून अंडरवर्ल्डचा खात्मा केला.
अरुण गवळी च्या गॅन्ग ला देखील ठेचुन काढताना मुंडे साहेबांनी मित्रपक्षाचा दबाव झुगारुन टाकला होता.
मुंडे साहेबांच्या घरी थेट दुबई येथुन धमक्यांचे फोन यायचे म्हणे..
परंतु त्यांनी त्या धमक्यांना भिक न घालता पोलीस खात्याचे मनोबल ऊंचावुन संघटीत गुन्हेगारीची पाळंमुळं खणुन काढली.
महाराष्ट्र दंगलमुक्त करण्याचे श्रेय देखील मुंडे यांच्या कारकिर्दीतच दडलेले आहे.
अद्वितीय लोकनेते असलेले गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे सर्वोत्तम गॄहमंत्री आहेत हे त्यांचे विरोधक देखील मान्य करतात.
● संदीप प्रभाकर नागरगोजे , गंगाखेड ●
Comments
Post a Comment